मराठा समाजाचा विकास ला प्राधान्य देत : सारथी संस्थेला सर्व प्रकारची मदत करणार.... मा. अजित पवार उपमुख्यमंत्री महा. राज्य 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी मा. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. यावेळी सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राहील आणि संस्थेला तातडीनं ८ कोटींचा निधी दिला जाईल, असं जाहीर केलं. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कदापि बंद होणार नाही. समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन २०२०-३०’ हा दहा वर्षांचा आराखडा तयार केला जाईल. ‘सारथी’वरचे हेत्वारोप टाळून बदनामी थांबवावी, असं आवाहन केलं. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील. सारथीच्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी सरकारची आहे. ‘सारथी’संस्थेसंदर्भात विविध व्यक्ती, संस्था, मान्यवरांकडून आलेली निवेदनं, पत्रं, मागण्यांची नोंद घेण्यात आली आहे; त्यांचा एकत्रित विचार करून सर्वांच्या मनासारखा सकारात्मक निर्णय व्हावा, ही सरकारची भूमिका आहे. त्या अनुषंगानं मराठा समाजाच्या विविध विद्याशाखा, अभ्यासक्रमात शिकणाऱ्या, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क त्वरीत मिळावे यासाठी ८ कोटी रु. सारथीला उपलब्ध करून दिले जातील. ‘तारादूत’ यांना २ महिन्यांचा प्रलंबित निधी तत्काळ दिला जाईल. ‘सारथी’ आणि ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या दोन्ही संस्था अनुक्रमे ओबीसी व कौशल्य विकास मंत्रालयाऐवजी पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेण्यात येईल. ‘सारथी’चा कारभार पुढच्या काळात अधिक पारदर्शक व नियमानुसारंच होईल. संस्थेकडून होणारा खर्च दरमहा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. दर दोन महिन्यांनी कामाचा आढावा घेण्यात येईल. तसंच आलेल्या नवीन सूचना, कल्पना विचारात घेऊन वाटचालीची पुढची दिशा निश्चित करण्यात येईल. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं सुरू झालेल्या संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेशा पद्धतीनं व त्यांचा गौरव वाढवणारा असेल, याची काळजी घेऊ. ‘सारथी’चा गौरव वाढवण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचं राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.