नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करा-आमदार महेंद्र थोरवे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कर्जत दि. 18 गणेश पवार


परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले.कर्जत तालुक्यातील पिकांचे झालेले नुकसान यांची पाहणी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली.त्यावेळी आमदार थोरवे यांनी तसे आदेश दिले आहेत.


                     कर्जत तालुक्यातील भाताच्या शेतीचे सरत्या पावसासोबत आल्याने वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.जागोजागी भाताची शेती जमीनदोस्त झाली असून भाताचे पीक शेतात खराब होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपल्या शेतीचे पंचनामे व्हावेत यासाठी शासनाकडे मागणी करीत आहे.त्याचवेळी भाताच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.मात्र पंचनामे वस्तुनिष्ठ होत आहेत किंवा नाही तसेच शेतीचे नुकसान किती झाले आहे याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आज रविवारी सुट्टीच्या दिवशी पाहणी दौरा केला.या पाहणी दौऱ्यात कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार भरत भगत,शिवसेनेचे उपजिल्हा भाई गायकर,शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक शिवराम बदे,तालुका पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे,जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे,विभागप्रमुख पांडुरंग बागडे,शरद ठाणगे,आदी उपस्थित होते.आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकारी वर्गासह तालुक्यातील चांदई,पिंपळोली भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. आमदार महेंद्र थोरवे यांनी चांदई,तळवडे आणि पिंपळोली गावात जाऊन तेथील शेतीची पाहणी केली.भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकारी वर्गाला पंचनामे बाबत सूचना केल्या.निसर्ग चक्रीवादळच्या वेळी स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी हे वस्तुनिष्ठ पंचनामे करीत नसल्याचे दिसून आले होते.त्यामुळे शेतकरी आमच्याकडे येऊन आपल्या व्यथा मांडत असून आपले सरकार असून आम्हाला झालेल्या नुकसानीची मदत नाही अशा तक्रारी करतात.मात्र यावेळी सर्व नुकसानग्रस्त भागातील पिकाचे सरसकट पंचनामे प्रशासनाने करावेत अशी सूचना आमदार थोरवे यांनी अधिकारी वर्गाला केली.


                    शासनाच्या वतीने तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी,प्रभारी तालुका कृषी बाळासाहेब लांडगे, नायब तहसीलदार अमोल चव्हाण, यांच्यासह अतिरिक्त गटविकास अधिकारी सी ए रजपूत,अधिकारी यांच्यासह कृषी,महसूल आणि ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.त्यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे यांनी कृषी विभाग,महसूल विभाग आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून साधारण 80 जणांची टीम शुक्रवार पासून पंचनामे करीत असल्याची माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.तर 21 ऑक्टोबर पर्यंत तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे यांचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती तहसीलदार यांचे वतीने नायब तहसीलदार अमोल चव्हाण यांनी दिली.पंचनामे करण्याच्या कामात 54 ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी,22 तलाठी आणि 24 कृषी सहायक हे काम करीत असल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांना प्रशासनाचे वतीने देण्यात आली.