मुख्यमंत्री साहेब इच्छा मरणाला परवानगी द्या; लोककलावंतची आर्त हाक - लोककलावंतांची आर्त हाक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


पुणे, दि. 17 – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेला लॉकडाउन संपला. महाराष्ट्रात अनलॉक, मिशन बिगेन अगेन चा नारा दिला गेला असला तरी नाट्यगृह आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे लॉक अद्याप उघडण्यात आलेले नाही. यामुळे हातावर पोट असलेले लोककलावंत मागील सहा महिन्यापासून बेरोजगार आहेत. आता सांस्कृतिक कार्यक्रमांना सरसकट परवानगी द्या, अन्यथा इच्छामरणाला अशी मागणी ‘महाराष्ट्र कला मंडल’ या कलावंतांच्या शिखर संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.  


 


लॉकडाउनच्या काळात लोककलावंत आणि पडद्यामागील इतर कलाकार, कामगार यांचे प्रचंड हाल झाले आहेत. आजही अनेक कलावंत भाजी विकणे, रिक्षा चालवणे असे कामे करून आला दिवस ढकलत आहेत. या कलावंतांची व्यथा सांगणारा अत्यंत ह्रदयस्पर्शी असा सहयाद्री क्रांतीनाना माळेगावकर या बालिकेचा व्हिडिओ बरेच काही सांगून जाणारा आहे.


 


या विषयी बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले की, मागील सहा महिन्यापासून लॉककडाउन असल्यामुळे लोककलावंत बेरोजगार आहेत. होळी पौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा हा महाराष्ट्रातील गावं खेड्यातील जत्रा, यात्रांचा सीझन असतो. मात्र यंदा तो कलावंतांना मिळालेला नाही. सार्वजनिक गणेशोत्सवात कलावंतांना सादरीकरणातून काही प्रमाणात अर्थाजन झाले असते परंतु महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवार मर्यादा घातल्याने ती संधीही कलावंतांना मिळालेली नाही. चित्रपट, मालिकांच्या शूटिंगला शासनाने परवानगी दिली आहे, त्याच धर्तीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमावली लागू करून सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी द्यावी. पुणे, मुंबई शहरात मॉल सुरू करण्यात आले आहेत, मॉल्स पेक्षा कमी गर्दी सांस्कृतिक कार्यक्रमात असते यामुळे राज्यातील सर्व नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करावेत अशी मागणी खाबिया यांनी केली आहे.


 


महा कला मंडलचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांचा सर्वाधिक फटका लोककलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट, कामगार यांना बसला आहे. लॉकडाउनच्या काळात समाजातील विविध घटकांनी आघार दिला होता, मात्र आता या लोकांना रोजगार मिळत नसल्याने बहुतांश कलावंताचे जगणे मुश्किल झालेले आहे. सरकारने अनलॉक, मिशन बिगेन अगेन घोषणा केली असली तरी सांस्कृतिक क्षेत्रावरची बंधने अद्याप शिथिल झालेली नाहीत. सरकारने गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात सर्व लोकलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची परवानगी द्यावी आणि जर शासन लोककलावंतांना सन्मानाने जगण्यासाठी कार्यक्रम करण्याची परवानगी देऊ शकत नसेल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या.