कर्जत तालुक्यात कडकडीत बंद... पोलिसांचा जागता पहारा,सीमा बंद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 



कर्जत,ता.16 गणेश पवार


                            रायगड जिल्ह्यात शासनाने लागू केलेला लॉक डाऊन 100टक्के बंद राहिला आहे.कर्जत तालुक्यात येणाऱ्या तिन्ही जिल्हा सीमा पोलिसांकडून बंद करण्यात आल्या आहेत.दरम्यान,तालुक्यातील दोन मोठ्या आणि चार लहान अशा सर्व बाजारपेठा बंद असून सर्वत्र शुकशुकाट आहे.


                             रायगड जिल्हयाच्या पालकमंत्री यांनी जाहीर केलेला लॉक डाऊन जिल्ह्यात सुरू झाला आहे.रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार लॉक डाऊन सुरू झाला आहे.त्यानुसार कर्जत तालुक्यातील माथेरान हे पर्यटन स्थळ 100 टक्के बंद असून तेथे बाहेरून येणाऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही व्यक्तींना परवानगी नाही.दस्तुरी नाका येथून बाहेरचे व्यक्ती किंवा कामगार वर्ग यांना परत पाठवले जात आहे.त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कर्जत तालुक्यात बाहेरच्या जिल्हयातून येणारे रस्ते येथे कर्जत आणि नेरळ पोलिसांनी सीमा हद्द बंद केल्या आहेत.कर्जत पोलिसांनी चौक-कर्जत रस्त्यावर तालुका हद्द सुरू होते,तेथे बंदोबस्त लावला आहे.तर नेरळ पोलिसांनी कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील शेलू येथील आणि मुरबाड-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरील जिल्हा हद्द बंद केली आहे.त्या तिन्ही सीमा हद्द येथे पोलिसांकडून कोणत्याही अन्य जिल्ह्यातील वाहनांना प्रवेश दिला जात नाही.केवळ मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेत काम करणारे यांनाच परवानगी देण्यात येत आहे.


                     शेलू,कळंब आणि कर्जत येथे पोलिसांकडून सीमा हद्दीत बॅरिकेट लावण्यात आले असून पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर,कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अरुण भोर, नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील हे आपल्या पथकासह तालुक्यात बंदोबस्त ठेवून जमावबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी आग्रही आहेत.21 जुलै पासून श्रावण महिना सुरू होत असून त्या आधी मांसाहार खाणारे यांना मांस खायला मिळणार नाही.अमवास्येपर्यंत मांसाहार विक्रीस परवानगी द्यावी अशी मागणी अखिल खाटीक समाज संघटनेने केली होती.मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही,यामुळे श्रावण महिन्याची सुरुवातीचा दिवस यावेळी मांसाहार विरहित असणार आहे.दुसरीकडे कर्जत तालुक्यातील कर्जत शहरातील कर्जत आणि दहिवली येथील बाजारपेठ 100 टक्के बंद असून त्याखालोखाल मोठी असलेली नेरळ बाजारपेठ देखील बंद आहे.तालुक्यातील कडाव,कशेले, डिक्सळ आणि कळंब येथील लहान बाजारपेठा देखील लॉक डाऊन मध्ये बंद असणार आहेत.त्यात त्या सर्व बाजारपेठेत रस्त्यावर बसणारे यांना देखील व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली असल्याने ग्रामीण भागातून पिकवलेल्या शेतमालाची विक्री देखील बंद आहे.शासनाने तहसीलदार यांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेत असलेले दूध किराणा यांना ऑनलाइन नोंदणी करून घरपोच विक्री करण्याची परवानगी दिली आहे.मात्र घरपोच विक्री करण्यासाठी दुकान उघडले तर पोलिसांचा खाक्या आड येत आहे,त्यामुळे त्याबाबत देखील व्यापाऱ्यांच्या मनात कारवाई होण्याची भीती आहे.


                 कोरोना संक्रमण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले असून दररोज वाढणारे रुग्ण ही चिंतेची बाब असून कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी स्थानिक आमदार आणि सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष महेंद्र थोरवे यांच्याकडे लॉक डाऊन आणि कोविड हॉस्पिटल यांची मागणी 5 जुलै रोजी केली होती.त्यांची ही बाजू तालुक्यात कोविड हॉस्पिटल उभे राहिल्यानंतर आमदार आणि सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष थोरवे यांनी पालकमंत्री यांच्याकडे कर्जत विधानसभा मतदारसंघात कडक लॉक डाउनची मागणी केली होती.त्यामुळे कर्जत तालुक्यातील जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉक डाऊनला तालुक्यातील सर्वपक्ष यांच्या मागणीचे पाठबळ देखील आहे.परिणामी कर्जत तालुक्यात पुढीप 10 दिवस कडकपणे लॉक डाऊन पाळला जाईल आणि त्यातून कोरोना ची साखळी तुटेल असा विश्वास सर्वपक्षीय समितीला आहे.