पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*जन आंदोलनांच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी महाराष्ट्र शासनावर जो विश्वास दाखवून उपोषण सोडले त्याबद्दल शिवसेना प्रवक्त्या तथा माजी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे आभार मानले...*
● जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलेल्या मागण्यांवर कार्यवाही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली... डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई दि. ०७ : नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ह्या विविध असंघटित क्षेत्रातल्या मजुरांच्या प्रश्नावर मध्यप्रदेश येथे उपोषणासाठी बसलेल्या होत्या. त्यांच्यासमवेत मध्यप्रदेशातील मानव अधिकार सुरक्षा संघटन चे कार्यकर्ते एन.बी. चौबे हेदेखील उपोषणास बसले होते. या संदर्भात विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना काल शैलजा अराळकर व सुनीती सु.र .जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय यांनी दि.६मे २० रोजी रात्री निवेदन पाठवले होते. या निवेदनावर मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव विकास खरगे आणि राज्याचे अतिरिक्त सचिव राजीव जलोटा यांना डॉ.गोऱ्हे यांनी श्रीमती मेधाताईंनी केलेल्या सूचना काळविल्या होत्या. त्याची त्यांनी तात्काळ दखल घेतली याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे आभार मानले.
डॉ.गोऱ्हे या मेधाताईंनी पाठविलेल्या निवेदनातील खालील मागण्यांबाबत सरकारकडे पाठपुरावा करत होत्या. यात
◆ काही निर्णय होऊनही अजूनही हजारो लोक रस्त्यावर चालत आहेत. हजार लोक जाण्यासाठी ताटकाळले आहेत. त्या त्या जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी त्यांना थांबवून, आश्वस्त करून, मोफत व अत्यल्प दरात वाहने करून पुढे पाठविण्याबाबत तसेच चालणाऱ्यांची रस्त्यात खाण्याची, पाण्याची मोफत व्यवस्था केली जावी.
◆ लोकांना कागदपत्रे मिळण्यात खोळंबा होऊ नये. या श्रमिकांना e-pass मिळवणे जमत नाही तेव्हा त्यांना मेडिकल टेस्ट व पास एकाच ठिकाणी मिळेल असे पहावे. लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, रांगा लावणे हे करावे लागू नये. नोडल अधिकारी यांना यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना श्रीमती पाटकर यांनी केली होती याबाबत डॉ.गोऱ्हे ह्या राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.
◆ परराज्यात चाललेल्या लोकांना त्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करावी.
◆ या श्रमिकांना जाण्यासाठीच्या मुख्य मार्गांवरील ट्रेन शेड्युल जाहीर करावे नाही तर सतत गोंधळाची परिस्थिती राहते आणि लोक गर्दी करत राहतात अशी मागणी देखील श्रीमती पाटकर यांनी केली आहे.
◆ आजही रेशन कार्ड नसलेल्या लोकांना मोफत रेशन मिळत नसल्यामुळे किंवा त्यात अनेक अडचणी येत असल्यामुळे ती व्यवस्था योग्य रीतीने केली पाहिजे. अन्नछत्रांमध्ये जाण्यास त्यांना सांगितले जाते पण तिथे लांबच लांब रांगा, तासन्तास काढणे आणि शेवटी खिचडी खाणे हे दीर्घकाळ करणे लोकांना शक्य नसते. रेशनच्या डाळ - तांदूळ बरोबर त्यांना तेल मिरचीची ही गरज असते. किमान स्थलांतरित मजुरांसाठी तत्काळ तात्पुरत्या रेशन कार्ड ची व्यवस्था व्हावी..
◆ तसेच अनेक उद्योगांमधील मालकांनी वा ठेकेदारांनी त्यांच्या कामगारांना, मजुरांना आधी केलेल्या कामाचीही मजुरी दिलेली नाही. त्यासाठी, व लॉक डाऊन च्या काळातीलही मजुरी देण्यास श्रम आयुक्तांच्या आदेशानुसार बाध्य करावे व मजुरी न देणार्यांवर कारवाई केली जावी. तसेच या निमित्ताने 1979 च्या कायद्यानुसार स्थलांतरित मजुरांची नोंदणी व रेकॉर्ड तयार केले जावे.
- अशा विविध मागण्या श्रीमती पाटकर यांनी केल्या आहेत. तसेच या सर्व कार्यात सामाजिक संघटनांचे सहकार्य शासनाने घ्यावे असेही आवाहन केले आहे.
या सर्व मागण्या डॉ.गोऱ्हे यांनी निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब यांना त्यांच्या निवैदनाच्या प्रतीसह पाठवल्या आहेत. तसेच मुख्य सचिव श्री अजय मेहता अतिरिक्त मुख्य सचिव श्री.राजीव जलोटा,मुख्यमंत्री खाजगी सचिव श्री विकास खारगे यांच्याकडे मेधा पाटकरांच्या अपेक्षा कळवल्या आहेत.
त्यावरती मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ दखल घेतलेली असून आणि वेगवेगळ्या मागणी वरती सरकारने काय निर्णय घेतले आहेत आणि अजून संबंधित विभागांकडून कसा पाठपुरावा करता येईल त्याच्याबद्दल लवकरच माहिती कळविली जाणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
त्याच बरोबर, जिल्हानिहाय अडचणींविषयी तपासणी व उपाययोजना व त्यासाठी तसेच अन्य मदत कार्यासाठीही सामाजिक संघटनांचे सहकार्य-सहभाग घेण्यात येईल तसेच सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून असंघटितांसाठी दीर्घकालीन सोयी सुविधांचे नियोजन करण्यात येईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. याबाबतची सविस्तर माहिती डॉ.गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरून मेधा पाटकर यांना दिली आहे. तसेच मेधाताईंनी महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवून उपोषण सोडल्याबद्दल श्रीमती पाटकर यांचे डॉ.गोऱ्हे यांनी आभार मानले आहेत.
-डॉ.नीलम गोऱ्हे,