पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मी गेली पस्तीस एक वर्षांपासुन सामाजिक चळवळीत काम करत आहे . समाजवादी विचाराच्या वातावरणात बालपण गेल्यानंतर फुले शाहु आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातुन सुरवात करत अखिल भारतीय मराठा महासंघ , पुरोगामी परिवर्तनवादी समतावादी मानवतावादी कामगार संघटनाशी जवळीक साधली .मी पस्तीस वर्षापुर्वी गावाकडे नवनाथ पारायण गुरचरित्र पारायणाचे निरुपण आणि सत्यनारायणाची पूजा करत असताना मला चमत्कार काल्पनिक अवास्तव अनैसर्गीक गोष्टी समजुन आल्या त्यातुन वैदिक धर्म ग्रंथाचा अभ्यास सुरु केला त्यातुन मला सत्याचा शोध घ्यावासा वाटला . मग मी संत तुकाराम महाराज व महात्मा जोतीराव फुले यांच्यावरील पुस्तके वाचली . ते करत असतानाच संघटनेच्या कार्यात झोकुन दिले होते त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपरा फिरलो समाजाचे वास्तव डोळ्याने पाहिले . 2011 सालच्या दुष्काळात महाराष्ट्राच्या वाड्यावस्त्या फिरलो , लोकांच्या चुलीपर्यंत जाऊन डोळ्याने परिस्थिती पाहीली , परिस्थितीचे अवलोकन केले आणि त्यावर एक साठ पानी अहवाल वजा परिस्थितीची माहिती समस्या व त्यावर उपाय असणारे जनहितासाठी "दुष्काळाचे राजकारण व भरडलेला शेतकरी" हे पन्नास हजार प्रती स्वखर्चाने छापुन लोकापर्यंत पोहोचवल्या . केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दखल घेऊन एक पत्र मला पाठवले होते . अशाप्रकारची ग्राउंडलेवलवर जाऊन काम केले . मुलांच्या शैक्षणिक प्रवेशापासुन ते अभ्यास व परिक्षा व पुढे उदरनिर्वाह करणे इथपर्यंत माझ्या परीने मी सहकार्याची भुमिका ठेवली . मुले अभ्यासाचा ताण आईवडीलांच्या अवास्तव अपेक्षा व नापास होण्याच्या परिणामा मुळे ज्या आत्महत्या होत होत्या त्यावर मराठा चेंबर्स मध्ये समुपदेशन कार्यक्रम घेतला .मुला मुलींच्या विवाहासाठी वधुवरसुचक चे काम केले व आता व्हाॅटसअप ग्रुप च्या माध्यमातून करतोय . सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक आर्थिक औद्योगिक क्षेत्रात काम करताना विविध विषयांवर आणि तत्कालीन विषयावर सातत्याने लिहतोय , शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आहे . स्रियांच्या विषयावर ,स्री संस्कृतीची गुलाम , आरक्षण विषयावर ; सामाजिक सांस्कृतिक धार्मिक विषयावर " हिंदु की ब्राह्मणी " ऐतिहासिक विषयावर क्रांतीसिंह नाना पाटील , हुतात्मा बाबु गेनु सैद , अण्णासाहेब पाटील , इतिहासाचे प्रतीक (किल्ले) , अर्थकारणावर " काळा पैसा नोटबंदी व अर्थ क्रांती " शिवस्मारकाचा वाद , जेम्स लेन कृत शिवरायांवरील पुस्तकावरील परिक्षण , स्वराज्याचे सेनापती वीर बाजी पासलकर , सामाजिक वर मराठा महासंघाचा रणसंग्राम , प्रभाकर दुर्गे यांचेवर जीवन संघर्ष अशी अनेक विषयांवर लिखाण केले . विविध प्रश्नासाठी लढत असताना प्रत्येक आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला .
माझ्या आजपर्यंतच्या चळवळीतील कामाचा आढावा घेत असताना असंख्य स्वभावाची , परिस्थितीच्या कार्यकर्ते समाज बांधव , नेते मंडळीशी संबंध आला , कार्यकर्ते व सर्व जाती धर्माचे लोकांनी सहकार्य केले प्रेम दिले पण काही संघटनाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी दमबाजी केली , धमक्या दिल्या पण मी न घाबरता त्याला धिराने एकाकी झुंज दिली पण काम थांबवले नाही का लिहणे थांबवले नाही . कारण माझ्या कामात नैतिकता होती सत्यता होती द्वेष नव्हता , वैयक्तिक स्वार्थ नव्हता .
मी आता संघटनेत नाही तर चळवळीत काम करत आहे , मी आजपर्यंत कुठलेही काम वैयक्तिक स्वार्थासाठी करत नाही . जात धर्म पंथ प्रांत भाषा लिंगा पलिकडे जाऊन समता स्वातंत्र्य बंधुता न्याय व मानवता आधारित चळवळीच्या कार्याकरता काम करत आहे . मला कुणाकडुन वैयक्तिक मिळवायचे नाही , कुठलीही प्रसिद्धी मिळवायची नाही , कुठल्याही प्रकारचे पद , लाभाचे पद मिळवायचे नाही . मला सारा बहुजन समाज एक व्हावा व संघटीतपणे बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा असे वाटते .
माझ्या लिखाणाच्या बाबतीत सांगायचे तर मी अनुभवले , ऐकले , वाचले ते सदविवेकबुध्दी व तर्कशुद्ध पध्दतीने त्याची चिकित्सा करत त्यातील सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे .
माझ्या मनात कुणाबद्दल किंतु नाही , द्वेष मद मत्सर नाही , मला कुठेही सामाजिक चळवळीतुन सत्ता संपत्ती प्रसिद्धी मिळवायची नाही तर मला बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा असे वाटते .
धन्यवाद
जय भारत
जगजीवन बबनराव काळे
भारतीय बहुजन समाज समन्वयक