पुणे प्रवाह न्युज पोर्टल
राज्यात १ कोटी ९ लाख शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वाटप : छगन भुजबळ
___________________________________
राज्यातील ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. १ ते १० एप्रिल या कालावधीत राज्यातील १ कोटी ९ लाख २९ हजार ६९४ शिधापत्रिकाधारकांना तब्बल २८ लाख ७२ हजार २८० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे १५ लाख १७ हजार ८९१ क्विंटल गहू, ११ लाख ७६ हजार ७३० क्विंटल तांदूळ, तर १३ हजार ८८० क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ५ लाख ८ हजार २३६ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी दर महिन्याला ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ३ एप्रिलपासून ५ किलो अतिरिक्त मोफत तांदूळ टप्याटप्याने देण्यात येत आहे. या योजनेसाठी ३ लाख ५० हजार ८२ मे.टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.