संजीवन समाधी सोहळा आता ‘विश्वशांती दिवस’ डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली घोषणाः संतश्री ज्ञानेश्वर माऊलींचा 724वा संजीवन समाधी सोहळा राजबागलोणी काळभोर येथे संपन्न

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


संजीवन समाधी सोहळा आता ‘विश्वशांती दिवस’

डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली घोषणाः संतश्री ज्ञानेश्वर माऊलींचा 724वा संजीवन समाधी सोहळा राजबागलोणी काळभोर येथे संपन्न


पुणे, दिः 13 डिसेंबर: तत्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधुन कार्तिकी शुध्द त्रयोदशी, म्हणजेच 13 डिसेंबर 2020 पासून संपूर्ण जगभर हा दिवस ‘विश्वशांती दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. अशी घोषणा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीने तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळा श्री. विश्वदर्शन देवता मानवता मंदिर, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे संपन्न झाला.

यावेळी रामेश्वरमचे ट्रस्टी व विद्याउपासक स्वामी राधाकृष्ण गंगाधर दशपुत्रे, अक्कलकोट स्वामी संस्थानचे प्रमुख पुजारी पवन गुरूजी, इस्लामचे गाढे अभ्यासक डॉ. रफीक सय्यद, प्रा.डॉ. मुकुंद गायकवाड, सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण हे उपस्थित होते.

तसेच,माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे अ ध्यक्ष व विश्वस्त डॉ. मंगेश तु. कराड, सह कार्यकारी विश्वस्त डॉ.सुचित्रा कराड-नागरे, महासचिव स्वाती कराड-चाटे, उपाध्यक्ष व विश्वस्त ज्योती कराड-ढाकणे, कवियत्री सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि पंढरपूरचे दत्तात्रय बडवे हे उपस्थित होते.

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे गुह्य गुपीत सांगीतले आहे त्या मार्गावर समाज चालेल तर तो सुखी होईल. 724 वर्षापूर्वी त्यांनी सुख, शांती आणि समाधानाचा मार्ग दाखविला आहे. निसर्गाने कोरोनाच्या रूपात संपूर्ण जगाला दिलेली ही धोक्याची घंटा आहे. अशावेळेस साधू, संत आणि महात्म्यांनी दिलेला संदेशाचे अनुकरण केल्यास मानवजातीचे कल्याण होईल.”

डॉ. सय्यद रफीक म्हणाले,“ वर्तमान काळात सृष्टीवरील प्रत्येक व्यक्ती ही भाऊ बहिण हे नाते विसरले आहे. त्यामुळेच 700 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वची माझे घर’ हा संदेश देऊन सर्वांना सुखी होण्याचा मार्ग दाखविला. त्यांनी प्रत्येकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला. या पृथ्वीतलावर विज्ञानाने समाजचे भले होईल, पण मानवाचे भले हे ईश्वराच्या चरणी गेल्यावर होईल. आपल्या संतांनी जो जीवन जगण्याचा सार्थक संदेश दिला आहे. तोच संदेश आज डॉ. विश्वनाथ कराड देऊन माणसे जोडण्याचे अद्वितिय असे कार्य करीत आहेत.”

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ रामेश्वरम, अक्कलकोट आणि राजबाग लोणी यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडलेला आहे. कोणत्याही कामात सातत्य, त्यात तपश्चर्या केल्या नंतरच यश मिळते याची प्रचिती येथे होत आहे. मानवाच्या मनात आधुनिकता हवी पण तसेच चांगल्या विचारांची धुनी असली तर चित्त चांगले राहते. तसेच, ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला करूणाचा संदेश हा जगाला तारू शकेल.”

स्वामी राधाकृष्ण गंगाधर दशपुत्रे यांनी समारंभाला आशिर्वाद देऊन रामेश्वर येथील प्रसाद दिला. विश्व शांती व कल्याणाची कामना केली. सौ. उर्मिला विश्वनाथ कराड व डॉ. मुकुंदराव गायकवाड यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचा संदर्भ देऊन आजच्या काळात मानवाने कसे जीवन जगावे हे सांगितले.

ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळाही संपन्न झाला. कीर्तन व संगीतभजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच, कलश पूजन, संत प्रतिमा पूजन, विश्वदर्शन देवता मूर्ती, विठ्ठल रूख्मिणी मूर्ती, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज व मंदिरातील सर्व मूर्तींचे पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन झाले. सकाळी ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली.

ह.भ.प.श्री. रामचंद्र महाराज इंगोले, महेश महाराज नलावडे आणि शालिकराम महाराज खंदारे यांची किर्तने झालीत.