सरपंचांनी आर्थिक नियोजन केल्यास ग्रामोन्नती होईल भास्कर पेरे-पाटील यांचे विचारः दुसरी ‘राष्ट्रीय सरपंच संसद’

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



सरपंचांनी आर्थिक नियोजन केल्यास ग्रामोन्नती होईल


भास्कर पेरे-पाटील यांचे विचारः दुसरी ‘राष्ट्रीय सरपंच संसद’


पुणे, दि. 3 डिसेंबर: “सरपंचांनी राजकारण न करता गावाचा विकास व कल्याणासाठी आर्थिक नियोजन करावे. नव नवीन कल्पनांना साकारतांना जनतेचा सहभाग घ्यावा. गावात पाणी, शिक्षण ,य आरोगय व आवश्यक गरजांच्या पुर्तेतेसाठी काम केल्यास निश्चितच ग्रामोन्नती होईल.” असा सल्ला पाटोडा या आदर्श गावाचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी दिला.


‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटेतर्फे 2 ते 4 डिसेंबर या दरम्यान आयोजित तीन दिवशीय दुसर्‍या ऑनलाईन ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या दुसर्‍या दिवशी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


या वेळी उत्तरप्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप साही, राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे, माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महाराष्ट्र राज्यातील मॉडेल व्हिलेज प्रोग्रामचे कार्यकारी संचालक पद्मश्री पोपटराव पवार, खादी आणि व्हिजेज इंडस्ट्री कमिशनचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, सरपंच संसदेचे राज्य समन्वयक संजय गजपुरे, जालना येथील कृषी विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, संदीप शिंदे आणि वेदांत लि.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रितू झिंगोण हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.


या प्रसंगी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील आणि सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.


भास्कर पेरे पाटील म्हणाले,“सरकारकडे पैसे मागण्यापेक्षा गावातच नवी योजना राबवून आर्थिक मजबूती देण्याचे काम सरपंचांनी करावे. शासनाच्या योजना व घटनेच्या तरतुदी बरोबरच आहेत परंतू अधिकारी त्याचा योग्य वापर करत नाही ही देशासाठी मोठी चिंतेची बाब आहे. ग्राम विकासाला आधुनिकतेची जोड आवश्यक द्यावे. आमच्या गावात आपत्कालीन निधी म्हणून दर महिन्याला 200 रूपये जमा केले. त्याचा वापर हा कोविडच्या काळात झाला. अश्याच प्रकारच्या अनेक योजना सरपंचांना आपल्या क्षेत्रात राबविता येतील. ग्रामविकास करतांना सरपंचानी बुद्धि आणि मेहनतीचा वापर करावा.”


सूर्य प्रताप साही म्हणाले,“कोविडच्या काळात या देशातील प्रत्येक व्यक्तीची ही शारीरिक व मानसिक हानी झालेली आहे. शहरातील व्यक्ती हे परत गावाकडे आले खरे पण रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. यावेळी सरपंचांनी त्यांना धीर देणे गरजचे आहे. सरपंचानी या संधीचा फायदा घेऊन गावातच रोजगार कसा उपलब्ध होऊ शकतो या वर भर दयावा. सरकारने ग्राम पंचायतासाठी ज्या योजना तयार केल्या आहेत त्याचा लाभ विकासासाठी कसा होईल हे पहावे. केंद्राने कोविड काळातील गंभीर स्थिती लक्षात घेता मनरेगा आणि फूड प्रोसेसिंगसाठी विशेष निधी उपलब्ध केला आहे. देशातील प्रत्येक राज्यात कौशल्य विकास करण्यावर भर दिला जात आहे.”


छत्रपती संभाजी राजे म्हणाले,“ आपले गाव नाविन्यपूर्ण करण्यावर सरपंचांनी भर दयावा. सरपंचांना सशक्त करने ही काळाची गरज आहे. त्यांनी लक्ष निर्धारित करून नियोजन करावे. शासनाकडून अधिक सीएसआर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावा. आज शेकडो किल्ल्यांचे संवर्धन कार्य सुरू आहे. रायगड किल्ल्यासाठी जवळील 21 गावांचे संरक्षण महत्वाचे आहे. त्यासाठी जनतेला एकत्र आणण्याची जबाबदारी ही सरपंचाची आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून सरपंचांनी आपली ताकद दाखवायची आहे.”


पोपटराव पवार म्हणाले,“ आत्मनिर्भर गावांसाठी संस्कारीत नेतृत्वाची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गाव विकास करणे व पाणी नियोजन केल्याने दुष्काळी भाग नष्ट करता येतो. स्वयंपूर्ण आत्मनिर्भर गांव करतांना मार्केटिंग आवश्यक आहे. संघर्षाशिवाय नवनिर्मिती करता येत नाही. त्यासाठी सरपंचाने संयम आणि आरोग्य निट ठेवू ग्राम विकासाचा ध्यास घ्यावा. भविष्यात प्रत्येक गांव ऑक्सिजन युक्त व व्यसन मुक्त करण्यासाठी कार्य करावे. नियोजन, अंमलबजावणी आणि त्यात गुणवत्ता कशी येईल यावर भर द्यावा.”


चंद्रकांत दळवी म्हणाले,“ गावाची गरज आणि नियोजन हे ग्राम विकासाचे सूत्र ध्यानात ठेवावे. गावाचा विकास हाच त्यांचा श्वास असावा. त्यासाठी देशातील आदर्श लोकांकडे पाहून कार्य करावे. गावाचा अर्थिक विकास, मानव विकास व लोक सहभागाचा आराखडा तयार करावा. सरकारने भौतिक विकासासाठी ज्या योजना लागू केल्या आहेत, त्याची माहिती त्यांनी घ्यावी. आत्मनिर्भर गावासाठी कुटुंब व त्यांचे उत्पन्न वाढवावे. यासाठी शेती व दुग्ध व्यवसाय करावा.”


विनय कुमार सक्सेना म्हणाले, “ सरपंच हा आपल्या पंचायतराजचा मुख्यमंत्री असतो. गांवाचा विकास हा देशाचा विकास असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजीच्या विचारांना देशात लागू करण्याचे काम सुरू केले. खादी कमिशनच्या माध्यमातून गावातील सर्वात शेवटच्या कमकूवत व्यक्तिला आपल्या पायावर उभे केले आहे. या कमिशनच्या माध्यमातून 5 वर्षात देशात 29 लाख लोकांना रोजगार दिला आहे. हनी मिशनशी शेतकरी जोडल्या गेल्यास सृष्टीच्या विकासाबरोबरच त्यांचाही विकास होईल.”


विजय माइनकर म्हणाले, “आर्थिक आणि सामाजिक विकासातून ग्रामविकास होऊ शकतो. शेती बरोबरच कृषी पर्यटन व्यवसाय करावा. त्यातून महिला व युवकांना रोजगार निर्माण होईल.”


संदीप शिंदे म्हणाले,“ देशातील मोठ्या कंपन्या सीएसआरचा निधी ग्राम विकासासाठी करतात. प्रत्येकाचा उद्देश हा वेगवेगळा असतो. ते आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, महिला विकास यावर जोर देतात.”


संजय गजपुरे म्हणाले,“ या संसदेने राज्यात एक चळवळ उभी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजीे म्हणायचे की स्वराज्यकडून आता आपल्याला सुराज्यकडे जायचे आहे. त्यामुळे खेड्यांकडे चला. गांवे स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार योजना राबवित आहेत.”


यानंतर सर्वश्री सरपंच पुरूषोत्तम घोगरे, गंगाधर निखाडे, अजय महाडिक, शिवाजी सुरसे, संतोष टिकेकर, निखील कडू, बाळासाहेब देशमुख, भारत अप्पा पाटील, विकास जाधव, नामदेवराव गुंजाळ, बाजीराव खैरनार आणि प्रकाश मुसळे यांनी आपले अनुभव सांगितले.


व्यंकटेश जोशी यांनी स्वागतपर भाषण केले.


प्रा. गिरीजा लगड यांनी सूत्रसंचालन केले. योगेश पाटील यांनी आभार मानले.