नेरळ प्राथमिक केंद्राच्या चुकीमुळे महिला आणि बाळाचा मृत्यू 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कर्जत दि.4 प्रतिनिधी


               नेरळ जवळील पिंपळोली येथील माहेरवासीण असलेल्या महिलेला बाळंतपणानंतर आपला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमवावे लागले आहे.डॉक्टर हजर नसल्याने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविकेने बाळंतपण केले.पण त्या बाळंतपणानंतर प्रसूत महिला अत्यवस्थ झाल्याने तर बाळ गुदमरल्याने त्याचा देखील जीव गेला आहे.आरोग्य यंत्रणेच्या चुकीमुळे माता आणि बाळ अशा दोघांना आपले जीव गमवावे लागले असल्याने कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


                   कर्जत तालुक्यातील पिंपळोली गावातील मनोहर काळण यांच्या मुलीचे तालुक्यातील बीड गावातील तरुण राजेंद्र रुठे यांच्याशी विवाह झाला होता.2018 मध्ये विवाह झाल्यानंतर पूनम राजेंद्र रुठे या गरोदर असल्याने त्यांना पहिल्या गरोदरपणासाठी पिंपळोली या गावी माहेरी आणण्यात आले होते.नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन तपासणी करणाऱ्या पूनम यांना बाळंतपणासाठी आज 4 ऑक्टोबर रोजी पहाटे पिंपळोली गावातून रिक्षाने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.रात्रीच्या वेळी डॉ महेंद्र धाडवड यांची ड्युटी होती,मात्र ते प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित नसल्याने ड्युटीवर असलेल्या निवासी आरोग्यसेविका संगीता सरोदे यांनी पहाटे चार वाजता पूनम रुठे यांना तपासले आणि सकाळ पर्यंत बाळंतपण होईल असे सांगितले.त्यानंतर सकाळी सात वाजता पूनम राजेंद्र रुठे या बाळंत झाल्या आणि त्यांच्या पोटी मुलगा जन्माला.नॉर्मल बाळंतपण झाले असल्याने पूनम रुठे यांच्यासोबत असलेले सर्वजण आनंदी होते.पण जन्मलेले बाळ हे गुदमरलेले असल्याने त्या बाळाला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात न्या आणि तेथे बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून उपचार घ्या अशी सूचना आरोग्यसेविका सरोदे यांनी केली.त्यावेळी पूनम यांचे नातेवाईक हे बाळ चांगले दिसत असून त्याला कर्जत कशासाठी न्यायचे,असे सांगत होते.मात्र आरोग्यसेविका सरोदे यांनी बाळाला रिक्षाने नेरळ गावातील खासगी रुग्णालयात पाठवले. मात्र लहान मुलांच्या त्या खासगी रुग्णालयात बाळाला घेतले नाही त्यामुळे पालकांनी त्या बाळाला नंतर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ असताना देखील त्यांनी त्या काही तासापूर्वी जन्मलेल्या बाळाची साधी तपासणी देखील केली नाही आणि पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात पाठवून देत आपली जबाबदारी झटकली.त्यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथून पनवेल येथे जात असताना साधारण अकराच्या सुमारास नेरळ पासून कर्जत आणि पुढे या काळात कोणताही उपचार न झाल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला.


                 इकडे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपण झालेल्या माता पूनम रुठे यांच्या शरीरातून होणारा रक्तस्त्राव बाळंतपण होऊन दोन तास झाले तरी थांबत नव्हता.त्यामुळे आरोग्यसेविका सरोदे यांनी आपल्यावरील जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यासाठी पूनम यांना नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सकाळी नऊ वाजता पाठवून दिले.कर्जत येथे गेल्यानंतर आणखी मोठ्या प्रसंगाला पूनम राजेंद्र रुठे-22 यांना सामोरे जावे लागले आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला.त्यामुळे नेरळ येथून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी निघालेली रुग्णवाहिका ही कर्जत येथून पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात येऊ लागले.मात्र एमजीएम रुग्णालयात नेले जात असताना पूनम राजेंद्र रुठे यांच्या शरीरातील सुरू असलेला रक्तस्त्राव थांबला नाही आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चुकीच्या आरोग्य व्यवस्थेमुळे पूनम राजेंद्र रुठे आणि नवजात बालक यांना जीव गमवावा लागला आहे.आजच्या दिवशी ऑन ड्युटी असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र धाडवड हे त्या बाळंतीण महिलेला रक्तस्त्राव थांबत नव्हता.त्या तीन तासाच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचले नाहीत आणि त्यामुळे नवजात बाळाचा तसेच बाळंतीण यांचा मृत्यू झाला.तर स्टाफ नर्स असलेल्या संगीता सरोदे यांना दोन अडीच तासात बाळंतीण महिलेचे शरीरातून होणारा रक्तस्त्राव थांबवता आला नाही आणि त्यामुळे पूनम यांना जीव गमवावा लागला याबद्दल कर्जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.