शिक्षण हाच देशाचा खरा आँक्सिजन पद्मभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार ; पुण्यधाम आश्रम दिनानिमित्त रितू छाब्रिया यांना पुरस्कार प्रदान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


-प्रसिद्धीसाठी-                                                           ६-३-२०२० 


 


शिक्षण हाच देशाचा खरा आँक्सिजन


पद्मभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार ;


पुण्यधाम आश्रम दिनानिमित्त रितू छाब्रिया यांना पुरस्कार प्रदान



पुणे : ज्ञान हे माणसाला आनंदी, सशक्त बनवते, ही शिकवण आश्रमांमध्ये दिली जात होती. तप, साधना आणि उत्तम नागरिक घडविण्याचे ठिकाण म्हणजे आश्रम. गरीबी, आजार यांसह अनेक समस्या आज देशासमोर आहेत. भारताला ख-या अर्थाने विकसित देश करायचे असेल, तर शिक्षण हाच देशाचा आॅक्सिजन आहे. शिक्षणासोबतच उत्तम आरोग्य सुविधा  हे देखील असणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ.शां.ब.मुजुमदार यांनी व्यक्त केले. 


 


विश्व जागृती मिशन ट्रस्टतर्फे पुण्यधाम आश्रम दिनानिमित्त कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुण्यधाम आश्रमामध्ये पुण्यधाम ह्युमॅनिटरियन सर्व्हिस पुरस्कार मुकुल माधव फाऊंडेशनच्या कार्यकारी विश्वत रितू प्रकाश छाब्रिया यांना देण्यात आला.  यावेळी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मविभूषण डॉ.विजय भटकर, विश्व जागृती मिशन ट्रस्टच्या चेअरपर्सन माताजी कृष्णा कश्यप, संस्थेचे अध्यक्ष सदानंद शेट्टी, घनश्याम झंवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुण्यधाम ह्युमॅनिटरियन सर्व्हिस पुरस्कार मुकुल माधव फाऊंडेशनच्या कार्यकारी विश्वत रितू प्रकाश छाब्रिया यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते. 


 


डॉ.शां.ब.मुजुमदार म्हणाले, भारतीय संस्कृती व हिंदू धर्माने आश्रम संकल्पनाची देणगी जगाला दिली. इतर कोणत्याही देशात ही संकल्पना नाही. आश्रमांमध्ये समाज व्यवस्थापनाचे धडे दिले जाते. ब्रह्मचर्य, ग्रहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार प्रकार आहेत. आश्रमात ॠषीमुनी तप आणि साधना करीत असत. मात्र, हे सर्व समाजाकरीता होत असे. आश्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रोत्सहन दिले जात होते आणि त्यातून गुरुकुल पद्धतीची सुरुवात झाली. त्यातील आश्रम ही संकल्पना आहे. संदीपनी व वसिष्ठ ॠषींच्या आश्रमाची उदाहरणे संपूर्ण जगाला माहिती आहेत. त्याप्रमाणेच पुण्यधाम आश्रम पुण्यामध्ये कार्यरत आहे.  


 


सत्कारमूर्ती रितू छाब्रिया म्हणाल्या, कोणताही पुरस्कार म्हणजे एक जबाबदारी असते. माझ्यावर देखील या पुरस्काराने आणखी एक जबाबदारी वाढली आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना आरोग्य, शिक्षणासोबत समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशाला महासत्ता बनविण्याकरीता समाजातील उपेक्षित घटकांना बळकट करुन त्यांना मुख्य प्रवाहासोबत जोडणे गरजेचे आहे. त्याकरीता सामाजिक संस्थांसोबतच सामान्यांनी पुढे यायला हवे. आम्ही देखील फाऊंडेशनच्या माध्यमातून समाज बळकटीकरणाचे काम करीत आहोत. 


 


डॉ.विजय भटकर म्हणाले, आपण सर्व समाजाचे सेवक आहोत. प्रत्येक दिवस आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. ज्ञानाचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे, त्या पुण्यात पुण्यधाम आश्रम असणे, हे उत्तम आहे. आश्रमातर्फे समाजात मानवतेच्या भावनेने काम करणा-यांना पुण्यधाम पुरस्काराने गौरविण्यात आले. रितू छाब्रिया यांचे कार्य त्याप्रमाणे आहे. ससून हॉस्पिटलसारख्या ठिकाणी सेवा देण्याचे उत्तम काम त्या करीत आहेत. शाळा व शैक्षणिक संस्था सुरु करुन शिक्षण दानाचे सामाजिक कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना दिलेला पुरस्कार सर्वतोपरी योग्य आहे. 


 


माताजी कृष्णा कश्यप म्हणाल्या, माझ्या अंर्तमनातून दिलेल्या प्रेरणेने पुण्यधाम आश्रमाची निर्मिती झाली. अनेकांनी सांगितले होते की याठिकाणी तुम्ही काही करु शकणार नाही. मात्र, तेव्हा स्वत:ला आलेल्या आव्हानातून या आश्रमाची स्थापना झाली. निसर्गाकडून मी खूप काही शिकले. मला आता समाजासाठी खूप काही करायचे आहे. 


 


सदानंद शेट्टी म्हणाले, पुण्यधाम आश्रमाची स्थापना सामाजिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक संस्कृती जपण्याचे केंद्र व्हावे, या उद््देशाने झाली. गोशाळा, वृद्धाश्रम, आरोग्यविषयक सेवांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन त्यांना शिक्षण देण्याकरीता आम्ही कार्य करीत आहोत. गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करुन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. दरवर्षी 5 मार्च हा दिन यापुढे पुण्यधाम आश्रम दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 


 


धीरेन नंदू, मीना नंदू, द्वारकादास माहेश्वरीवनिता दासवानी, रावसाहेब सूर्यवंशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विश्व्स्त दीपक पायगुडे, विनोद कपूर, शशिकांत पागे, घनःश्याम झंवर, पंकज धेडीया व गणेश कामठे उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर रवि शर्मा यांचे तबलावादन व डॉ.गिरीष चरवड यांचे सरोद वादन झाले. रमेश ग्रोव्हर आणि अमिता बैंदूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. घनश्याम झंवर यांनी आभार मानले. 


 


* फोटो ओळ:  विश्व जागृती मिशन ट्रस्टतर्फे पुण्यधाम आश्रम दिनानिमित्त कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुण्यधाम आश्रमामध्ये पुण्यधाम ह्युमॅनिटरियन सर्व्हिस पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  पुण्यधाम ह्युमॅनिटरियन सर्व्हिस पुरस्कार मुकुल माधव फाऊंडेशनच्या कार्यकारी विश्वत रितू प्रकाश छाब्रिया यांना प्रदान करण्यात आला. (डावीकडून) घनश्याम झंवर, रितू छाब्रिया, माताजी कृष्णा कश्यप, डॉ.शां.ब.मुजुमदार, डॉ.विजय भटकर, सदानंद शेट्टी.