आदिवासींनी आम्हाला समर्पण व निरपेक्ष भावाची सेवा शिकविली डॉ. प्रकाश आमटे यांचे मतः

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



कृपया प्रसिध्दीसाठी दि.29 नोव्हेंबर 2020


आदिवासींनी आम्हाला समर्पण व निरपेक्ष भावाची सेवा शिकविली


डॉ. प्रकाश आमटे यांचे मतः 25 व्या ऑनलाईन संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत पाचवे पुष्प गुंफतांना


पुणे, दि. 29 नोव्हेंबर:“ आदिवासींकडून एकमेकांना मदत करणे, संयम आणि गरजा कमी ठेवणे या सारख्या अनेक गोष्टी आम्ही शिकल्या. आदिवासींनी दिलेल्या प्रेमांमुळेच आज एवढे मोठे कार्य उभे राहिले आहे. त्यांनीच आम्हाला समर्पण भाव व निरपेक्ष सेवा करण्याचे शिकविले.”असे विचार लोक बिरादरी प्रकल्पचे संस्थापक, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत 24 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 25 व्या ऑनलाईन तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


याप्रसंगी समाजसेविका डॉ. मंदाताई आमटे, मुंबई येथील आयआयटीचे माजी प्राध्यापक .डॉ.दीपक पाठक, भारतीय कार्डियोलॉजी सोसायटी पुणेचे अध्यक्ष डॉ. जगदीश हिरेमठ, सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये आणि शिल्प तांबे हे सम्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.


अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.


या प्रसंगी, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू प्रा.डॉ.मिलिंद पांडे, डॉ. मिलिंद पत्रे, डॉ. सुहासिनी देसाई हे उपस्थित होते.


डॉ. प्रकाश आमटे म्हणाले,“ 22 व्या वर्षी आदिवासींसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर बाबांच्या डोळ्यात एक वेगळी चमक पहावयास मिळाली. तीच ऊर्जा घेऊन माझी पत्नी मंदा व आम्ही असे दोघोही हेमलकसा येथे जाऊन जीवनाचे नवे पर्व सुरू केले. 7 ते 8 महिने आदिवसींशी कोणताही संपर्क झाला नाही. परंतू संयम ठेवल्याने पुढील बर्‍याच गोष्टी सहज साध्य होत गेल्या. बर्‍याच समस्यांना तोंड देवून आम्ही येथे खंबीर उभे राहिलो. आदिवासींच्या मनात आम्ही आत्मविश्वासाची ज्योत पेटविली. त्यानंतर त्यांना शिक्षित करणेे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि शेती करणे शिकविले. तसेच, प्राणी वाचविण्याचे ज्ञान त्यांना दिले. तेथेच शाळा काढून शिक्षण दिले. परिणामी 15 मुले डॉक्टर झाली, काही वकील झाली आणि काही मुलांनी आयआयटीमधून शिक्षण घेतले. सर्वात महत्वाचे म्हणजे यातील 80 टक्के मुले परत गडचिरोली येथे येऊन समाजसेवा करीत आहेत.”


“समर्पण भावने काम करणे हे सर्वात महत्वाचे आहे. साधेपणा ही आमची शक्ती असून आम्ही आजही निरपेक्ष भावनेनेच सेवा करीत आहोत. तोच वसा सर्व मुला मुलींनी घेतला आहे. आमच्यावर निर्मित केलेल्या चित्रपटामुळे आमचे साधे जीवन लोकांच्या जीवनाला भिडले.त्यामुळे जाहीर कार्यक्रमांसाठी निमंत्रणे वाढली. त्यात विद्यार्थ्यांचेही प्रमाण वाढले. त्यामुळे तरूणांनी आपापल्या क्षेत्रात जमेल तशी समाजसेवा सुरू केली. या चित्रपटाने तरूणांना प्रेरित केले, याचा आम्हाला अभिमान आहे.”


डॉ. दीपक पाठक म्हणाले,“आज अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिकवितात. पण अध्यापनाचे तंत्र मात्र त्यांना अवगत नसते. एमटेक किंवा डॉक्टरेटची पदवी त्यांच्यासाठी पुरेशी मानली जाते. पण त्यांनी शिकविलेले विषय विद्यार्थ्यांपर्यंत नीटपणे पोहचविले जात नाहीत. यासाठी त्यांनी शिकवावे कसे, यासबंधी प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक आहे. मूल्यवर्धित शिक्षणाची सुद्धा गरज आहे. केवळ आई वडिलांनी दिलेले संस्कार पुरेसे नसून शिक्षकांकडून मिळणारी प्रेरणा विद्याार्थ्यांचे आयुष्य बदलून जाते. काही विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येता. त्यांच्या मनात महत्वकांक्षा असते. कष्ट करण्याची तयारी असते.अशा मुलांना त्यांनी शिक्षणाची वाटचाल कशी करावी. याचा सल्ला व मार्गदर्शन दिल्यास असे विद्यार्थी खूप मोठे झेप घेऊ शकतात.”


डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले,“ मन आणि शरीर यांच्या परस्पर सबंधांवर अधिक विचार करण्याची वेळ आली आहे. नाते सबंधांचे मुळ कुटुंब संस्थेत आहे. ही जगातील सर्वात प्राचीन संस्था असून ती जितकी बळकट असेल, तितका समाज सुखी असतो. याला धर्माचे सुद्धा अधिष्ठान असते.”


“ समाजापुढे एखादा विचारवंत एखादी विचारधारा मांडतो. पण ती समाजाला मान्य होत नाही, तेव्हा मात्र त्याला एकला चलोरे ही भूमिका घ्यावी लागते. कालांतराने त्याचे विचार समाजाला मान्य होतात. दोन व्यक्तींचे एकमेकांशी का जुळते, याचा शोध अजून चालूच आहे. समाज बांधण्यासाठी एकमेकांशी संवाद साधण्याचे कौशल्य उपयुक्त ठरते. काही बाबतीत मात्र आपण एखाद्याच्या बोलण्यामुळे विनाकारण जखमी होतो. अशावेळेस निरपेक्ष भावनेने कोणाला काही दिल्यास आपल्याला एक वेगळाचा आनंद प्राप्त होतो.”


डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ जन्म आणि नशीब या दोन्ही गोष्टी मावनाच्या हातात नसतात. त्यामुळे नशीब शब्दाकडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन कसा असतो त्यावर सुख आणि दुःख अवलंबून असते. कर्म करतांना 20 टक्के भाग नशीबावर सोडावा आणि 80 टक्के भाग आपल्या हातात म्हणजे कर्मावर आधारित ठेवावा. विचारांच्या माध्यमातून आपल्याला मनः शांतीकडे जाता येते. आपल्या अपयशाचे खापर नशीबावर फोडू नये. त्यासाठी आत्मपरीक्षण करून योग्य निर्णय घेऊन कर्म करावे. कृष्णाने सांगितल्यानुसार कर्माचे फळ मिळणारच आहे परंतू अपेक्षा मात्र ठेवू नये. आपले काम चोखपणे बजावणे हेच आपल्या हातात आहे. अनुभव हे कर्म आहे. ”


डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारतीय संस्कृतीमध्ये त्याग आणि समर्पण हे महत्वाचे आहे. या संस्कृतीने ज्ञानाची पूजा आणि अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मन, बुद्धी आणि आत्मा हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. चंचल मनाला अध्यात्माचा स्पर्श झाल्यास शांती मिळते.”


डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले.


प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पोर्णिमा इनामदार यांनी आभार मानले.