*श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल* *-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वास*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


दि. 21 ऑगस्ट 2020.


*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून*


*श्री गणरायांना वंदन व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा*



पुणे, दि. 21 :-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केलं असून राज्यावरील कोरोनाचं संकट दूर कर, महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असं साकडं श्री गणपती बाप्पांना घातलं आहे. बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिवबंधक नियमांचं पालन करुन साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशिर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरंच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणानं साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही. बुद्धीची देवता असलेल्या श्रीगणरायांच्या समस्त भक्तांनी श्रीगणेशोत्सवासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल तसंच श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा मला विश्वास आहे, असं सांगून उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव काळात सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.


00000000