जय गणेश ज्ञानवर्धन अभियानातील' समाधान कांबळे करणार आयआयटी मद्रास येथे पीएचडी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


'जय गणेश ज्ञानवर्धन अभियानातील' समाधान कांबळे करणार आयआयटी मद्रास येथे पीएचडी-


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात 


 


पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी मदत करण्यात येते. याच अभियानातून अनेक विद्यार्थी यशस्वी होतात. यामधील एक विद्यार्थी ज्याने जय गणेश विद्यार्थी पालकत्वच्या सहाय्याने आणि आपल्या बौद्धीक प्रतिभेच्या जोरावर शास्त्रज्ञ होण्याचा आपला प्रवास सुरु करताना त्याची आयआयटी मद्र्रास येथून पीएचडी करण्यासाठी निवड झाली आहे. 


 


समाधान कांबळे हा मूळचा सोलापूरचा. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी आई- वडिलांनी पुण्याकडे धाव घेतली आणि तो देखील त्यांच्यासोबत पुण्यात आला. शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा हायस्कूल इयत्ता ७ वी मध्ये असताना तो दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेत सहभागी झाला. त्याची घरची परिस्थती अगदी बेताचीच. आई रस्त्यावर बसून बांगड्या विकते तर वडील स्वारगेटच्या फुटपाथवर चांभाराचा व्यवसाय करतात. 


 


आपल्या परिस्थितीवर मात करुन शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ त्याला जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेने दिली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली त्याची शालेय व महाविद्यालयीन जीवनाची यशस्वी वाटचाल झाली आहे. ट्रस्टने सर्व प्रकारचे आर्थिक व इतर सहाय्य केले आहे. 


 


समाधान कांबळे म्हणाला, जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेच्या माध्यमातून माझा केवळ आर्थिक नाही तर सर्वांगीण विकास झाला. ध्येय मोठे ठेवण्याचे मार्गदर्शन मिळाले. फिजिक्स विषय घेऊन बी.एस्सी. चे शिक्षण घेतले. त्यानंतर इन्स्टिट्यूट आॅफ प्लाज्मा रिसर्च गुजरात येथे इंटर्नशिप केली. यानंतर आपण रिसर्च करु शकतो, हा विश्वास आला. आता फर्ग्युसन महाविद्यालयातून एम.एस्सी. करत आहे. यासोबतच पी.एच.डी. करण्याचे ध्येय आहे. यासाठी आवश्यक असणारी आणि अतिशय अवघड अशी सीएसआयआर-नेट आणि गेट २०२० (जीएटीई)ही परिक्षा उत्तीर्ण झालो असून आयआयटी मद्र्रास येथून पीएचडी आता करणार आहे. या सर्व प्रवासात जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेचा सिंहाचा वाटा असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.