जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण करावीः डॉ. रघुनाथ माशेलकर वेबिनारच्या माध्यमातून माईर्स एमआयटीचा 38वां स्थापना दिवस साजरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण करावीः डॉ. रघुनाथ माशेलकर


वेबिनारच्या माध्यमातून माईर्स एमआयटीचा 38वां स्थापना दिवस साजरा


 


पुणे, दिः 5 ऑगस्टः “भारताच्या इतिहासात आजचा ऐतिहासिक दिन असून एमआयटीचाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा मंत्र दिला आहे. आत्मनिर्भर म्हणजेच आत्मविश्वास असा होतो. त्यामुळे आता एमआयटीची धुरा सांभाळणारे सर्व सदस्यांनी लक्ष्य निर्धारित करून जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पाऊले उचलावी.”असे विचार जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.


माईर्स एमआयटीच्या 38वां स्थापना दिन सोहळा वेबिनाराच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.


तसेच, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, संस्थापक विश्वस्त डॉ. सुरेश घैसास, प्रा. प्रकाश जोशी हे उपस्थित होते.


माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्रा कराड-नागरे, सौ. ज्योती कराड-ढाकणे, डॉ. विरेंद्र घैसास व माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव हे उपस्थित होते.


डॉ. रघुनाथ माशेलकर,“कोविड 19 मुळे लाखों लोकांच्या नोकर्‍या गेल्या तसेच मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल, नॅशनल व पर्यावरणसारख्या बर्‍याच समस्या निर्माण झाल्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेऊन पुढील काळात काय करावे यावर संस्थेचा फोकस असावा. डॉ. कराड यांनी लावलेले बीज आज वटवृक्षामध्ये परिवर्तीत झाले आहे. 900 एकर जमीनीवर विस्तारित या संस्थेला पुढच्या सर्व पिढींमध्ये नेतृत्वाचे व शिकण्याचे गुण आहेत.”


डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भारताच्या संस्कृतीची जबाबदारी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने स्विकारुन त्या दिशेनेच वाटचाल करावी. अयोध्या येथे श्रीराममंदिर निर्मितीसाठी संस्थेतर्फे 21 कोटी रूपये मदत म्हणून दिली आहे. त्यातून या मंदिरात सर्वात मोठे गर्भगृह व ग्रंथालयाचे निर्माण करणार आहे. श्रीराम या एका शब्दानेच जगासमोर आम्हाला भारतीय संस्कृती मांडता येईल. विश्व शांती ही संकल्पना स्विकारून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आपले कार्य करीत आहेत. त्याच आधारावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी 1996 साली पहिली जागतिक तत्वज्ञान परिषदेत आयोजित केली होती. उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर संस्थेने आज चार विद्यापीठांची स्थापना केली आहे. वर्तमान काळात कोविड 19 मुळे जी स्थिती निर्माण झाली. ती गोष्ट लक्षात ठेऊन पुढील सर्व समस्यांसाठी तयार व्हावे लागणार आहे. प्रगतीसाठी नवनवीन कल्पनाचा अवलंब करणे अतिशय महत्वाची आहे.”


प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारताच्या इतिहासामध्ये अयोध्या येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मर्यादा पुरूषोत्तम रामाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. हा नियतीचा खेळ आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश संपूर्ण जगभरात पोहचावा म्हणून राममंदिराची निर्मिती होत आहे. त्यासाठी हा कोनशीला होत आहे आणि याच दिवशी एमआयटीचा आज 38 वा वर्धापन दिवस आहे. 21 व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल हे स्वामी विवेकांनदाचे भाकीत आता लवकरच साकार होईल.”


राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ देशातील 100 ट्रस्ट मध्ये माईर्स या संस्थेचा समावेश आहे. त्यामुळे या संस्थेच्या पदावरील जबाबदारी ही व्यवस्थित पार पाडू. डॉ. कराड यांनी लावलेल्या या वटवृक्षाची फळे ही पुढच्या पिढीला नक्कीच मिळेल. संस्थेतर्फे भगवान श्रीराम मंदिर निर्मितीसाठी 21 कोटी रूपये हे समर्पण भावाने दिले आहे जो एक ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे माईर्स संस्था ही आत अदभूत अशा वळणावर आलेली आहे. कोविड 19 च्या काळात संस्थेच्या हॉस्पिटलने अमुल्य योगदान देऊन शेकडो रूग्णांना बरे केले आहे.”


प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, मी एमआयटीचा प्रथम विद्यार्थी असून याच्या उन्नतीचा साक्षीदार आहे. नवीन वळणावरील आव्हानांचा सामना करायचा आहे. या विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण व व्यावसायिक शिक्षणावर अधिक भर दिला आहे. तीच परंपरा पुढे ही ठेऊन इनोवेशन, रिसर्च आणि आंत्रप्रेन्यूअरशीप बरोबर मुल्याधिष्ठित शिक्षणावर अधिक लक्ष असेल. याच जोरावर आम्ही जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम करू.


प्रकाश जोशी म्हणाले,“संशोधन आणि नवनिर्मिती या दोन गोष्टींवर अधिक भर देऊन कार्य करावे. तसेच, विद्यापीठातील प्रयोगशाळा आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अत्याधुनिकता आणावी. तंत्रज्ञानावर अधिक भर देणारी बिट्स पिलानी ही सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीचा आदर्श पुढे ठेऊन विद्यापीठाने वाटचाल करावी. तसेच, जास्तीत जास्त शिक्षकांना समाजोपयोगी पीएचडी करण्यास प्रोत्साहित करावे.”


 डॉ. एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले.


 यावेळी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा.दिपक आपटे हे ही उपस्थित होते.


प्रा. गौतम बापट यांनी सूत्र संचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.


 


फोटो ओळ - माईर्स एमआयटीच्या 38वां स्थापना दिन सोहळा वेबिनाराच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. सुचित्रा कराड-नागरे, राहुल विश्वनाथ कराड व प्रा. डॉ. विश्वनाथ दा. - कराड