उमरोलीतील डिकसळ शांतीनगर येथे कचऱ्याचा ढीग, घंटागाडी गायब, दुर्गंधीने ग्रामस्थ हैराण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


कर्जत दि. 11 गणेश पवार


 


           कोरोना विषाणूमुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. या विषाणूला रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. मात्र स्वच्छता व सामाजिक अंतर राखून या विषाणूला रोखता येऊ शकते. मात्र कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील या उलट चित्र आहे. गेले 9 दिवस डिकसळ शांतीनगर येथील कचऱ्याचा ढीग साचून पडला आहे परंतु घंटागाडी गायब आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


              कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्गावर असलेल्या गाव मिळून उमरोली ग्रुप ग्रामपंचायत बनली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील डिकसळ शांतीनगर भागात असलेल्या कचराकुंडीत कचरा जमा होऊन तब्बल 9 दिवस उलटून गेले आहेत. मात्र गावातील कचरा उचलणार घंटागाडी गायब झाली आहे. गेले 9 दिवस गावात घंटागाडी फिरली नसल्याने येथील कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे त्यातून दुर्गंधी येउन ती संबंध परिसरात पसरली आहे. या भागातून वाटचाल करताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. तसेच या अगोदर देखील ग्रामपंचायत हद्दीत घंटागाडी वेळेवर येत नसल्याचे तक्रार नागरिक वारंवार ग्रामपंचायतीत करत आले आहेत. मात्र ग्रामपंचायत याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूमुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. सर्वत्र ग्रामपंचायतीकडून स्वच्छता राखून जंतुनाशक फवारणी देखील करण्यात येत आहे. अशा स्थितीत उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील चित्र उलट असल्याने नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. तेव्हा लवकरात लवकर ग्रामपंचायतीने येथील कचरा उचलून गावात स्वच्छता राखावी अशी मागणी जोर धरत आहे.


 


 


चौकट


 


          घंटागाडीवरील चालक दोन दिवस आला नाही त्यामुळे गावातील कचरा उचलण्याचे व्यवस्थापन कोलमडले आहे. लवकरच चालकाची व्यवस्था करून कचरा उचलला जाईल अशी व्यवस्था आम्ही करत आहोत.


: विनोद चांदोरकर, ग्रामविकास अधिकारी, उमरोली ग्रामपंचायत


 


उमरोली ग्रामपंचायत हद्दीत अनेकदा कचरा साठून त्यातून दुर्गंधी येऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करण्याची घटना घडल्या आहेत. वारंवार ग्रामपंचायतीत तक्रारी करून देखील हीच परिस्थिती कायम आहे. कोरोना महामारीचा काळ सुरू आहे. तेव्हा स्वच्छता राखली गेली पाहिजे. याकरिता ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याचे व्यवस्थापन त्यांच्या स्तरावर करावे. अन्यथा आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार करावी लागेल.


किशोर गायकवाड, रायगडभूषण, सामाजिक कार्यकर्ते


 


फोटो ओळ


संग्रहित छायाचित्र


छाय गणेश पवार