*फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनचा* *कोरोना, चक्रीवादळ संकटकाळात संपूर्ण भारतभर मदतीचा हात*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनचा 


कोरोना, चक्रीवादळ संकटकाळात संपूर्ण भारतभर मदतीचा हात


 


पुणे : कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यामुळे देशाच्या विविध भागाचे, तसेच तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या संकटकाळात फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनने (एमएमएफ) संपूर्ण भारतभर मदतीचा हात दिला आहे. विविध स्तरांतील वंचित घटकांना, तसेच कोरोनायोद्ध्यांना पाठबळ देण्याचे काम फाउंडेशनने केले. 'एमएमएफ'चा २६ वा वर्धापनदिवस (दि. २६ जुलै) नुकताच झाला. या निमित्ताने व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी फाउंडेशनच्या कार्याबद्दल माहिती दिली. फाउंडेशनशी जोडल्या गेलेल्या सहकाऱ्यांकडून, कॉर्पोरेट दात्यांकडून, स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळे या संकटांचा सामना करणे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.


रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, "रोजंदारीवरील, स्थलांतरित मजूर, प्लम्बर आदी घटकांना ग्रोसरी किट, जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. अनामित्र आणि विकास खन्नाज फीड इंडिया यांच्या सहकार्याने एक लाखापेक्षा जास्त लोकांना अन्नधान्ये दिले. तसेच पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या १३ हजार स्थलांतरित मजुरांना चप्पल, खाद्य दिले. राजस्थानातील संगीत कलाकार, पुण्यातील तृतीयपंथी समाजाला रेशन देण्यात आले. कापडी मास्कच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून दिला. देशभरातील विविध समुदायांना त्याची मदत झाली आहे."


"या काळात रुग्णालयांच्या गरजा लक्षात घेऊन देशातील अनेक रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे, सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट दिले आहे. डॉक्टर्स, नर्स यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य फाउंडेशनने दिले आहे. वेंकीजच्या साहाय्याने एक लाख अंड्यांचे वाटप करण्यात आले. निसर्ग, अम्फान चक्रीवादळासह आसाममध्ये नुकत्याच आलेल्या २० हजार पूरग्रस्तांना मदत पुरविण्यात आली आहे. पूर्व भारतात रंगीन खिडकी संस्थेने सहकार्य केले. कोरोना व्हायरस आणखी किती दिवस राहणार याबाबत माहिती नसल्याने भविष्यातही या घटकांना सहकार्य करण्यासाठी जागतिक स्तरावरही निधी संकलन केले जात आहे," असेही त्यांनी नमूद केले.


छाब्रिया पुढे म्हणाल्या, "या संकटकाळात लढताना फाउंडेशनने चालू प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित केले आहे. आजवर ९६० सेरेब्रल पाल्सीग्रस्तांना थेरपी दिली आहे. ग्रामीण भागात लोकल चॅनेलच्या माध्यमातून फिजिओथेरपी आणि योगाची सत्रे घेण्यात आली. रत्नागिरीतील घोळप गावातील मुकुल माधव विद्यालयातील ६८० विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले. बेरोजगारीमुळे मुंबईतून पालघरला परतलेल्या १५० कुटुंबाना बियाणे देऊन शेती करण्यास प्रोत्साहित केले आहे. लडाखमधील गल्वान खोऱ्यात झालेल्या चकमकीत शहीद २० जवानांच्या कुटुंबाना अर्थसहाय पुरविण्यात आले. लडाखच्या महाबोडी इंटरनॅशनल सेंटरलाही साहाय्य देण्यात आले आहे. "