मोदी सरकारनं रोजगार निर्मितीसाठी उचललं पाऊल! रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती

मोदी सरकारनं रोजगार निर्मितीसाठी उचललं पाऊल! रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती
__________________________________


बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांच्या निशाणावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आता सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.  केंद्र सरकार रिक्त पदांची भरती करण्यासाठी अभियान सुरु करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सर्व मंत्रालय आणि विभागांना लवकरात लवकर यासंबंधी अॅक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर) तयार करून पाठविण्याचे निर्देश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिओपीटी) देण्यात आले आहेत.  
सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात गुंतवणूक आणि विकास दर वाढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या समितीची बैठक झाली. या बैठकीत नोकऱ्यांमध्ये रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ समितीच्या निर्देशानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व मंत्रालये आणि विभागांना पत्र लिहून जागरूक केले आहे. 
या पत्रात म्हटले आहे की, सरळ भरती असलेली पदे भरण्यात यावी आणि यांदर्भात माहिती कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे द्यावी. मंत्रालय आणि विभागाला महिन्याच्या पाच तारखेच्या आत यासंबंधी घेतलेल्या निर्णयाची माहिती  कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे सुपूर्द करावी लागणार आहे. ग्रुप A, B आणि C पदांची सरळ भरती केंद्रात होते. यामध्ये UPSC आणि SSC संचालित करते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे, देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची योजना केंद्र सरकारची आहे. यातच, विरोधी पक्षांनी रोजगार आणि गुंतवणुकीची मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे.