स्टार प्रवाह वरील गौरीच्या आयुष्यात येणार का नवं वळण?‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत नवा ट्विस्ट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



मुंबई :- स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गौरी आणि अनिलच्या लग्नासाठी जयदीपने पुढाकार घेतला. शिर्के पाटील कुटुंबात लग्नाची जय्यत तयारीही सुरु झाली आहे. मात्र लग्नाच्या ऐन मुहूर्तावेळी जयदीपच गौरी आणि अनिलचं लग्न मोडतो. असं नेमकं काय घडलं की जयदीपला इतका टोकाचा निर्णय घ्यावा लागला हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. जयदीपच्या या निर्णयाने गौरीच्या आयुष्यात पुढे काय होणार याची उत्सुकता देखिल शिगेला पोहोचली आहे. रविवार १८ ऑक्टोबरच्या महाएपिसोडमध्ये गौरी अनिलच्या लग्नातला मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता हा विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळेल.


गौरी आणि जयदीप अगदी बालपणापासूनचे मित्र. त्यामुळे या लाडक्या मैत्रीणीचं लग्न लावून देण्याची जबाबदारी जयदीपने स्वत:च्या खांद्यावर घेतली. जयदीपवर जीवापाड प्रेम करणाऱ्या गौरीने जयदीपच्या सांगणयावरुन मनाविरुद्ध जाऊन अनिल सोबत लग्नाला होकार दिला. ज्योतिकासोबत जयदीपचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं आणि त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी गौरीने एवढा मोठा त्याग करण्याचं ठरवलं. मात्र आता जयदीपनेच गौरीचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याने गौरीच्या आयुष्यात नवं वळण आलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या यापुढील भागात या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. त्यासाठी पाहायला विसरु नका १८ ऑक्टोबरचा महाएपिसोड दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.